सध्या उत्तर भारतात तिर्थयात्रा खुप मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. त्यापैकी रामदेवरा म्हणजेच बाबा रामदेव (योग गुरु रामदेव बाबा नव्हेत) यांचे प्रमुख स्थान आहे. रामदेवरा हे पोखरण पासुन १२ किमी उत्तरेला वसलेले आहे. तंवर राजपुत संत श्री रामदेव बाबा याची ही समाधी. ( १४५८ मध्ये त्यांनी येथे जिवंत समाधी घेतली असे सांगतात) आख्यायीका सांगीतली जाते की बाबांच्या चमत्कारांची ख्याती खुप दुरवर पसरलेली होती. त्यामुळे त्यांची परीक्षा घेण्यासाठी मक्का येथुन ५ पीर आले होते. बाबांच्या सामर्थ्याची प्रचीती आल्यावर मात्र त्यांनी आपले जीवन बाबांच्या चरणी अर्पण केले. तेव्हापासुन मुसलमान बांधव बाबांना राम शाह पीर किंवा रामा पीर म्हणुन पुजतात. तर हिंदु बाबांना कृष्णाचा अवतार मानतात.
बाबा रामदेव हे समतेचे प्रचारक होते. गरीब-श्रीमंत, ऊच्च-निच कसलाही भेदभाव न बाळगता त्यांनी समस्त श्रध्दाळुंच्या ईच्छा पुर्ण केल्या व आजही करताहेत. ऑगस्ट-सप्टेंबर मध्ये येथे खुप मोठी यात्रा भरते. लाखो श्रध्दाळु येथे बाबांच्या समाधीच्या दर्शना करीता येतात. सध्या दळणवळणांची साधने भरपुर असल्यामुळे लोक आपापल्या वाहनांनी किंवा ट्रेन, बस कसेही जातात पण अजुनही काही लोक मात्र पायीच जातात. कारण पायी गेल्यानेच बाबा प्रसन्न होतात असा समज आहे. खिशात काही मोजकेच पैसे, दिवसाला ४०-५० किमी अंतर पार पाडायचे असा नित्यक्रम असतो. या श्रध्दाळुंच्या जेवणाची व्यवस्था रस्त्यावरच्या गाववाल्यांकडुन जागोजागी अन्नछत्रे उभारुन केली जाते. असेच हे आजोबा भोपाळ वरुन पायी निघालेत. म्हणजे जवळ जवळ १००० किमी अंतर पायी जाणार हे आजोबा....